जलसंपदा विभागाने नोटीस बजावूनही महापालिकेने पाणी शुल्क भरले नाही, त्यामुळे जलसंपदा विभागाने आज जायकवाडी धरणातील औरंगाबाद शहराचा पाणी उपसा टप्प्याटप्प्याने कपात करण्याची कारवाई सुरू केली. जायकवाडी धरणवरील महापालिकेचे दोन्ही पंपगृह दोन तासांसाठी सील करण्यात आले. दोन तासानंतर पुन्हा हे सील उघडण्यात आले. महापालिकेने थकबाकी न भरल्यास 31 डिसेंबरला महापालिकेचा संपूर्ण पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.
औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महानगरपालिकेने जायकवाडी धरणावर 156 एमएलडी क्षमतेचे दोन योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याद्वारे रोज 140 एमएमएलडी इतका पाणी उपसा केला जातो, परंतु महापालिकेने मागील पाच वर्षांपासून या पाणी उपशाचे आठ कोटी शुल्क जलसंपदाकडे भरलेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेला नोटीस बजावून पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला होता.