ऐतिहासिक वारशाने समृद्ध अशी ही नगरी. कलाकुसर, इतिहास, संस्कृती असं देण लाभलेलं औरंगाबाद म्हणूनच महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून गौरवप्राप्त आहे. 52 दरवाजांचे शहर म्हणून परिचित या शहरातील ऐतिहासिक वैभव आजही मुग्ध करून टाकतात. मध्य हिंदुस्तानातील हे केंद्र सातवाहन, वाकाटाक आणि यादव या कालखंडातील आपले नाते सांगते. चौदाव्या शतकातील मुघल सल्तनीने एकेकाळी दिल्लीहून थेट देवगिरी किल्ल्याला आपली राजधानी हलवली. सोळाव्या शतकामध्ये निझामशाहीतील पंतप्रधान मलिक अंबरने औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलून टाकला. एकंदरीत औरंगाबादमध्ये मिश्र संस्कृतीची झलक बघायला मिळते. सुफी आणि शास्त्रीय रागदारीचा संगम येथे आहे. कलेचा वारसा सांगणारी पैठणी, हिमरु कारागिरी, बिदरी सारखे नाजुक कलाकुसरीच्या नक्षीकामाची भांडी आणि वस्तुंचे हे माहेरघर. पैठण म्हणजेच पूर्वीचे प्रतिष्ठाणनगरी हे व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र. संमिश्र संस्कृतीची झलक जशी वास्तु आणि कलेत दिसते, तशी ती पेहराव आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्यातही दिसून येते. अजिंठा आणि वेरुळ लेण्यांच्या रुपाने युनेस्कोच्या यादीतील दोन जागतिक वारसास्थळे सुद्धा औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे जगभरातून हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी वर्षभर गर्दी कायम बघायला मिळते.
वेरुळ लेणी

औरंगाबादपासून 26 किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध वेरुळ लेणी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे संरक्षीत स्मारक आहे. याठिकाणी 34 लेण्या असून त्यात 13 बौद्ध, 16 हिंदु आणि पाच जैन धर्मीय लेण्या आहेत. आधी कळस, मग पाया या स्थापत्य कलेतील जागतिक उत्कृष्ट नमुना म्हणजे कैलास लेणी, क्रमांक 16 होय. येथून एक किलोमीटर अंतरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वराचे पवित्र स्थान आहे. त्याशिवाय गणेशाच्या आद्यपीठापैकी लक्ष्मीविनायक मंदिर व शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्या गढीचे अवशेषही बघायला मिळतात. येथे जैन मंदिर असून खुलताबाद पाच किलोमीटर, तर पितळखोरा व गौताळा अभयारण्य अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे.
अजिंठा लेणी

रंगीत भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजिंठ्यात एकूण 30 कोरीव लेण्या आहेत. या लेण्या इसवी पूर्वी 200 ते 650 दरम्यानच्या आहेत. बौद्धधर्मीय असलेल्या या लेण्यांत बौद्ध मंदिरे, गुफा, विहार आणि गौतम बुद्धांच्या जीवनावर कोरलेले अनेक प्रसंग रेखीव आहेत. 1819 साली ब्रिटीश अधिकारी जॉन स्मिथने या लेण्यांचा पुर्नशोध लावला. अजिंठा लेणीनजीक निसर्ग अनुभवयाचा असल्यास व्ह्यू पॉंईंट, अजिंठा किल्ला, पारोची कबर, घटत्कोच लेण्या आणि जंजाळा किल्ल्याला जरूर भेट द्यावी.
बिबी का मकबरा

औरंगजेबचा मुलगा आझम शहा याने आपली आई बेगम रझियादुरानी हिच्या स्मरणार्थ 1678 साली बांधलेली भव्य इमारत म्हणजेच बिबी का मकबरा. आग्रातील ताजमहलची प्रतिकृती असलेला मकबरा दख्खनमधील मोगल स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुन्यांमध्ये गणना केली जाते. चार उत्तुंग मिनाराच्या पायथ्याशी मधोमध असलेली कबर बारीक कलाकुसरीने मढवलेली आहे. तिच्या भोवती नाजुक संगरवरी जाळ्या पर्यटकांचे हमखास लक्ष वेधून घेतात. या परिसरात औरंगाबदचा मुख्य सरदार पहाडसिंग याच्या काळात 1651 ते 1653 या काळात बांधलेला सोनेरी महलसुद्धा आहे. मध्ययुगीन वास्तुशैलीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. त्याशिवाय औरंगाबाद लेणी, पाणचक्की आणि शहरातील 52 दरवाजेही पाहण्यासारखे आहेत.
दौलताबाद किल्ला

खुलताबाद परिसरात यादवांनी बांधलेला देवगिरी महमंद तुघलकाने भारताची राजधानी दिल्लीतून हलविल्यानंतर दौलताबाद नाव ठेवले. या किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी असून किल्ल्याच्या मुख्य भागाच्या सभोवती खोल खंदक आहे. किल्ल्यात वर चढतांना मध्यभागात अंधाराने व्यापलेला मार्ग आहे. किल्ल्यावर मेंढातोफ, दुर्गातोफ, श्री दत्त व जनार्दन स्वामीच्या पादुका, गणपती मंदिर, भारतमाता मंदिर आणि 33 मीटर उंचीचा चांदमीनार पाहण्यासारखा आहे. याच परिसरात बनी बेगम बाग, औरंगजेब कबर, जरजरी बक्ष यांची समाधी, भद्रामारोती मंदीर, परियोका तालाब, सुलीभंजन, सुर्यकुंड, नगारखाना दरवाजा आणि थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ पाहण्यासारखे आहे.
पैठण
गोदावरीच्या तीरावरील दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध असलेले पैठण अर्थातच जुने प्रतिष्ठाण. शककर्ते सातवाहनांची राजधानी. जवळच आपेगावला ज्ञानेश्वरांचे जन्मठिकाण आपेगाव. त्याशिवाय महानुभव पंथ आणि जैन धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र. याठिकाणी नाथमंदिर, समाधीमंदिर, तिर्थखांब, नागघाट, जायकवाडी धरण, पक्षी अभयारण्य, ज्ञानेश्वर उद्यान, जुन्या पैठणचे अवशेष, नरसिंह मंदीर, शेषषायी विष्णुमुर्ती, पैठणी कलाकुसर आदी विलोभनीय आहे.
औरंगाबाद शहर

1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय : जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेले प्रमुख आकर्षण. याठिकाणी शिवकालिन ते मुघलकालिन साहित्य सामुग्रिचा खजिना बघायला मिळतो. तत्कालिन चलनपासून ते पेहराव, शस्त्रास्त्रे, दस्तावेज, धातूच्या वस्तू आहेत. पाचशे वर्ष जुने युद्ध गणवेश, चारशे वर्ष जुनी पैठणी साडीची कलाकुसर आणि औरंगजेबाचे हस्तलिखित कुरआन देखील येथे बघायला मिळते.
2. हैदराबाद/मराठवाडा मुक्तिसंग्राम दालन : मराठवाडा प्रदेशाचा तेजस्वी इतिहास रेखाटणारे हे दालन. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर एक वर्षे एक महिन्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झालेला भारतातील एकमेव प्रांत. या प्रदेशाच्या एकूणच संघर्षाचे शब्दचित्रण या दालनात बघायला मिळते. म्युरल्स आणि पॅनेल्सद्वारे ही गाथा मांडण्यात आली आहे.
3. शहरातील दरवाजे :

52 दरवाजांचे शहर ही या शहराची खरी ओळख. यामध्ये भडकल गेट, दिल्ली गेट, पैठणगेट, मक्का-मकई गेट, नौबत दरवाजा, रंगीन दरवाजा, रोशन गेट सद्यपरिस्थिती शाबूत अवस्थेत आहेत. या दरवाजांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे अभियांत्रिकीचा अनोखा मिलाफ. मुघल व निझाकमाल खंडातील या दरवाजे आणि तटबंद्यांमुळे शहर परिसराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अभ्यासक आणि पर्यटकांना वेधून घेणाऱ्या या दरवाजांमध्ये नवखंडा पॅलेसनजीक असलेला भडकल गेट. याव्यतरिक्त वेगवेगळ्या सत्ताधिशांनी वेगवेगळ्या उद्देशासाठी या दरवाजांची उभारणी केलेली आहे.
4. सिद्धार्थ उद्यान : मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय म्हणून लौकीक. वाघ, सिंह, हत्ती, हरिण, सांबर, मगर, सर्पालय या उद्यानात बघायला मिळतात. याशिवाय उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले कारंजे लक्ष वेधून घेतात. अबालवृद्धांसाठी करमणुकीची साधने, लहानग्यांसाठी रेल्वे आणि गौतम बुद्धांची मूर्ती या उद्यानाचे नाव सार्थकी ठरवते.
(संकलनः अभिजित हिरप-9404488912)